
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सलग येणाऱ्या सुट्ट्या आणि यात्रेची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेत मोठे बदल केले असून, गर्दीच्या नियोजनासाठी रेफरल पास आणि ५०० रुपयांचे विशेष देणगी दर्शन पास काही काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व भाविकांना आता ‘बिडकर पायऱ्यां’वरून मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने यांनी याबाबतचे जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे. श्री तुळजाभवानी देवीजींचा चैत्र पौर्णिमा महोत्सव यंदा ३० मार्च ते ३ एप्रिल २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. या कालावधीत राज्यभरातून लाखो भाविक तुळजापुरात दाखल होतात. त्यामुळे भाविकांना देवीचे दर्शन सुलभतेने व्हावे आणि गर्दीवर नियंत्रण राहावे, यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
दर्शन पासेसबाबतचे महत्त्वाचे निर्णय:
- रेफरल पास बंद: गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी ३१ मार्च ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘रेफरल दर्शन पास’ पूर्णपणे बंद राहील.
- स्पेशल देणगी दर्शन: ३१ मार्च ते २ एप्रिल २०२६ या दरम्यान ५०० रुपयांचा ‘स्पेशल देणगी दर्शन पास’ देखील बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रवेश मार्गात बदल:
भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी ३१ मार्चच्या रात्री १:०० वाजेपासून ते ५ एप्रिलच्या रात्रीपर्यंत मंदिरात प्रवेश करण्यासाठी ‘बिडकर पायऱ्या’ या मार्गाचा वापर केला जाणार आहे. २०० रुपयांचा सशुल्क दर्शन पास असणारे भाविक, अभिषेक पासधारक, धर्मदर्शन आणि मुख दर्शन घेणाऱ्या सर्व भाविकांना याच बिडकर पायऱ्यांच्या मार्गाने मंदिरात सोडण्यात येईल.
या बदललेल्या दर्शन व्यवस्थेची आणि प्रवेश मार्गाची सर्व महंत, पुजारी, सेवेकरी आणि भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
