हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील नांदुरा गावात जल जीवन मिशन योजनेच्या अंमलबजावणीतील अडचणी आणि गैरव्यवस्थापनामुळे संतप्त गावकऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. जल जीवन मिशन अंतर्गत एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीचा उपयोग गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आला होता. मात्र, शेतकऱ्याने ही विहीर स्वतःच्या शेतीसाठी वापरण्यास सुरुवात केली, ज्यामुळे गावात पाण्याचा तुटवडा निर्माण झाला.
गुरुवारी, संतप्त महिलांनी उपविभागीय अभियंताच्या कार्यालयात धरणे दिले. अधिकाऱ्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर महिलांनी आपले आंदोलन थांबवले. मात्र, या घटनेने जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीतील त्रुटी, कंत्राटदार व अधिकाऱ्यांमधील संगनमत आणि गैरव्यवस्थापन उघड केले आहे. गावकऱ्यांनी या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.