
वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय रामभाऊ शिनगारे (वय २५) आणि इजोरा येथील, सध्या मुक्काम वाशी येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया सुनील चव्हाण (वय २३) यांचा गेल्या रविवारी (ता. १५) मांजरसुंबा येथील कन्हेया मंगल कार्यालयात साखरपुडा झाला होता. चारच दिवसांपूर्वी आनंदाच्या वातावरणात पार पडलेल्या या समारंभानंतर दोन्ही कुटुंबांमध्ये लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती.
दरम्यान, अक्षया हिची लातूर येथे महापारेषणची परीक्षा असल्याने ती रविवारी पहाटेच वाशी येथून घरची टाटा नेक्सॉन (क्र. MH 25 BF 5064) या वाहनातून निघाली होती. वाहनात अक्षय रामभाऊ शिनगारे आणि चालक अक्षय यादव सिरसट (वय २२) हेही होते.
रत्नापूर पाटीजवळील धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट येडशी टोल नाका येथील कमानीला जाऊन जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. अपघातात अक्षया आणि अक्षय यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच रत्नापूर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी पाठवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येरमाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले.
चार दिवसांपूर्वी साखरपुड्याचा आनंद साजरा करणाऱ्या कुटुंबांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळल्याने दोन्ही गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. तरुण वयात अशा दुर्दैवी अपघातात दोन जीव गेल्याने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.