
धाराशिव – : सन २०२५-२६ या वर्षात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल धाराशिव जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.राज्यस्तरावर एप्रिल २०१५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीतील कामाचे मूल्यमापन करण्यात आले असून त्यामध्ये नव्या रुग्णांचा शोध, रुग्ण सहवासीतांना दिलेली पीईपी (रिफाम्पीसीनची एक मात्रा), डीपीएमआर सेवा,विकृती पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया तसेच निर्देशांकानुसार काम या सर्व बाबींचा विचार करण्यात आला.
या मूल्यमापनात धाराशिव जिल्ह्याला प्रथम,सातारा जिल्ह्याला द्वितीय तर चंद्रपूर जिल्ह्याला तृतीय क्रमांक देण्यात आला.जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्यामुळे धाराशिवची ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.या पुरस्कारासाठी सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. मारुती रामराव कोरे यांची निवड करण्यात आली असून त्यांचा सन्मान करण्यात आला.
पुरस्कार वितरण समारंभ २२ फेब्रुवारी २०२६ रोजी मंत्रालय,मुंबई येथे पार पडला.यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि आरोग्य राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव,राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक उपस्थित होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरीदास,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.बनसोडे,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.फुलारी, उपजिल्हा रुग्णालय कळंबचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.धर्माधिकारी तसेच कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातील कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी वेळोवेळी वैद्यकीय अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले.तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी,आशा कार्यकर्त्या तसेच कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांनी नियमित रुग्ण शोध मोहिमा प्रभावीपणे राबविल्या.
या यशाबाबत संदेश देताना डॉ. मारुती कोरे यांनी सांगितले की, कुष्ठरोग कर्मचाऱ्यांचे अथक प्रयत्न, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक,उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय यांचे सहकार्य यामुळेच हे यश प्राप्त झाले आहे.लवकर निदान,नियमित उपचार,सहवासीतांचा शोध व वेळेत दिलेली पीईपी यामुळे जिल्ह्यातील सर्व नवीन रुग्ण विनाविकृती अवस्थेत शोधण्यात यश आले असून सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.
शासनाने दिलेले ‘शून्य कुष्ठरोग प्रसार’ हे उद्दिष्ट निश्चितच साध्य करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शासनाने सन २०२७ पर्यंत कुष्ठरोगाचा प्रसार शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी समाजात दडून राहिलेले नवीन रुग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचार देणे तसेच नजीकच्या सहवासीतांना पीईपी देणे हे प्रमुख कार्य आहे.यामुळे रोगप्रसाराची साखळी खंडित होण्यास मदत होणार आहे.
सन २०२५-२६ मध्ये जानेवारी २०२६ अखेर ३९५ नवीन रुग्ण शोधून त्यांच्यावर बहुविध औषधोपचार सुरू करण्यात आले असून सर्व नजीकच्या सहवासीतांना पीईपी देण्यात आली आहे.नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ दरम्यान राबविण्यात आलेल्या ‘कुष्ठरुग्ण शोध अभियानात’ १४१ नवीन रुग्ण आढळले.तसेच ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती पंधरवडा’ राबविण्यात आला.
या पंधरवड्यात नियमित व विशेष सर्वेक्षणाद्वारे बिट भट्टी कामगार, खडी केंद्र कामगार,उसतोड मजूर, आश्रमशाळा व निवासी वसतीगृहातील विद्यार्थी,कारखाना कामगार,स्थलांतरित लोकसंख्या आदी दुर्लक्षित गटांची तपासणी करण्यात आली.एकूण २३,७५२ नागरिकांची तपासणी करून ५७१ संशयित रुग्ण शोधण्यात आले. त्यापैकी ३१ नवीन रुग्णांचे निदान निश्चित करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.या ३१ रुग्णांपैकी धुळे-१,जळगाव-१, अहिल्यानगर-५,लातूर-१, बीड-३, नाशिक-१ आणि मध्यप्रदेश-७ असे एकूण १९ रुग्ण बाहेरील जिल्हे/राज्यांतील असल्याचे निदर्शनास आले.
एकही नवीन रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने कुष्ठरोग ‘नोटिफायबल डिसीज’ म्हणून जाहीर केला आहे.त्यामुळे खाजगी दवाखान्यात नवीन रुग्ण निदान झाल्यास त्याची माहिती आरोग्य विभागास देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रुग्ण लवकरात लवकर शोधून उपचारावर आणता यावेत व विकृती टाळता याव्यात यासाठी खालील लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन तपासणी व उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ.मारुती कोरे यांनी केले आहे.