धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,मुक्त व निष्पक्षपणे पार पडावी,यासाठी राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांनी आचारसंहिता कालावधीत २४ तास कार्यरत तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.त्या अनुषंगाने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय येथे २४x७ तास कार्यरत तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
निवडणूक कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन,निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अडचणी, गैरप्रकार किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाच्या तक्रारी नागरिकांना येत असल्यास,त्यांची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करता यावी,हा या तक्रार निवारण कक्षाचा मुख्य उद्देश आहे.या कक्षाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची नोंद घेऊन त्यावर त्वरित व प्रभावी कार्यवाही केली जाणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक विभाग तसेच संबंधित निर्वाचक गणातील मतदारांनी निवडणुकीशी संबंधित कोणतीही तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.या सुविधेमुळे मतदारांना आपली तक्रार सहज, वेळीच आणि थेट प्रशासनापर्यंत पोहोचविता येणार असून,निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व विश्वासार्हता अधिक बळकट होणार आहे.
निष्पक्ष व शांततापूर्ण निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून,तक्रार निवारण कक्षाचा योग्य वापर करून लोकशाही बळकट करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.