नवभारत साक्षरता कार्यक्रमाला गती
धाराशिव – देशाला साक्षरतेच्या दिशेने अधिक सक्षम बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रम संपूर्ण देशभर राबविण्यात येत असून, राज्यात हा कार्यक्रम शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या माध्यमातून प्रभावीपणे अंमलात आणण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रजासत्ताक दिनानिमित्त असाक्षर मुक्त गावाची शपथ घेऊन हा राष्ट्रीय सण साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत देशातील १५ वर्षे व त्यावरील वयोगटातील असाक्षर व अल्पसाक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर देण्यात येत आहे.
या कार्यक्रमामध्ये केवळ अक्षरओळख मर्यादित न ठेवता, जीवनोपयोगी कौशल्यांच्या विकासालाही प्राधान्य देण्यात आले आहे.यामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता,डिजिटल साक्षरता,आपत्ती व्यवस्थापन कौशल्य,आरोग्याची काळजी व जनजागृती,बालसंगोपन व शिक्षण, कुटुंब कल्याण,व्यवसाय व उपजीविकेची कौशल्ये,तसेच कला, विज्ञान,तंत्रज्ञान,संस्कृती,क्रीडा, मनोरंजन आणि स्थानिक नागरिकांना आवड असलेल्या विषयांचा समावेश आहे.
“नवभारत साक्षरता कार्यक्रम” ही योजना दिनांक १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येत असून,ही योजना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये प्रभावीपणे अंमलात आणली जात आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून २६ जानेवारी २०२७ पर्यंत संपूर्ण गाव, कुटुंब व परिसर साक्षर करण्याचा संकल्प करण्यात येणार आहे.
“मी अशी शपथ घेतो/घेते की,माझे संपूर्ण कुटुंब व गाव २६ जानेवारी २०२७ पर्यंत साक्षर करीन.मी स्वतः असाक्षर राहणार नाही व इतरांनाही असाक्षर राहू देणार नाही,” अशी साक्षरतेची शपथ सर्व संबंधितांना देण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (योजना),जिल्हा परिषद यांनी दिली आहे.
२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने साक्षरतेचा हा संकल्प नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरेल,तसेच असाक्षर मुक्त गाव हे ध्येय साकार करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा,असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.