धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज
मित्राने दिलेल्या पैशांवरून निर्माण झालेल्या वादातून मित्राच्याच घरावर चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे ७९ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.
धाराशिव शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७०/२०२५, कलम ३३१(४), ३०५(अ) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार स्वप्नील सतीष जेटीथोर, श्वेत सुनील चिलवंत, निखील किरण सोनवणे (सर्व रा. धाराशिव) यांनी सदर चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
पथकाने तात्काळ शोध घेऊन तिघा आरोपींना धाराशिव शहरातून ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, फिर्यादी शुद्धोधन गायकवाड यांनी त्यांना उसनवारीने पैसे दिले होते व त्यावर जास्त व्याज आकारले जात होते. याच कारणातून आरोपींनी संगनमत करून कुरणेनगर येथील फिर्यादीच्या घरात चोरी केल्याचे त्यांनी मान्य केले.
आरोपींकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७९,७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस हवालदार महबूब अरब व रोहित दंडनाईक यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली.