धाराशिव – : भारतीय स्टेट बँक, आरबीओ धाराशिव यांच्या वतीने ‘अन्नदाता उत्सव’ उपक्रमांतर्गत आज धाराशिव येथे प्रगतशिल शेतकरी व कृषी उद्योजक ग्राहक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यास सुमारे 70 पेक्षा अधिक प्रगतशील शेतकरी व कृषी उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित अन्नदात्यांच्या सन्मानपूर्वक स्वागताने करण्यात आली.
यावेळी प्रादेशिक व्यवस्थापक मा. श्री. सुरेशबाबू उदयगिरी यांनी प्रास्ताविक भाषणात ‘अन्नदाता उत्सव’ आयोजनामागील उद्देश स्पष्ट करत, ग्रामीण विकासात स्टेट बँक ऑफ इंडियाची भूमिका अधोरेखित केली. शेतकरी व उद्योजकांनी आपल्या आर्थिक स्थैर्यासाठी एसबीआयशी अधिकाधिक संलग्न राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी (DSAO) मा. श्री. राजकुमार मोरे यांनी कृषी अनुदान योजनांची माहिती देत उच्च मूल्य प्रस्तावांमध्ये बँकांची भूमिका स्पष्ट केली. तसेच उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातीकडे वळावे, असे आवाहन करण्यात आले.
तसेच पीएमएफएमई योजनेचे प्रतिनिधी श्री. राहुल दिवाण (तांत्रिक अधिकारी, DSAO) यांनी पीएमएफएमई योजनेअंतर्गत उपलब्ध अनुदान, प्रक्रिया व दर्जेदार प्रकल्प सादर करण्याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी RMRU श्री. प्रदीप गायकवाड यांनी AIF, PMFME, AHIDF, AFEL आणि KSR योजनांवर सविस्तर सादरीकरण केले.
FSTO श्री. किरण चांदोरकर यांनी बँक वित्तपुरवठ्यात CIBIL स्कोअरचे महत्त्व, स्कोअर सुधारण्याच्या उपाययोजना व उच्च मूल्य प्रस्तावांसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली.
कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार मा. प्रादेशिक व्यवस्थापक व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काही कर्जदार व प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या यशोगाथा मांडत, एसबीआयकडून मिळालेल्या वेळेवरच्या आर्थिक सहाय्यामुळे आपल्या व्यवसायात झालेली प्रगती अनुभवांच्या माध्यमातून सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विद्याधर ढगे यांनी केले, तर मुख्य व्यवस्थापक (क्रेडिट) मा. श्री. आशिषकुमार श्रीवास्तव यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.
