धाराशिव – जिल्हा अग्रणी बँक,धाराशिवने विविध बँकाच्या माध्यमातून बँकेत दावा न केलेल्या ३१ कोटी ठेवी १ लाख ३१ हजार खातेदारांना परत मिळवण्याकरता जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे सोमवार दि.२९ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मेळावा आयोजित केला आहे.हा मेळावा केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या देशव्यापी “आपली पूँजी,आपला अधिकार – Your Money, Your Right” उपक्रमाचा एक भाग आहे.
या मेळाव्यास मैनाक घोष,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, धाराशिव तसेच विद्याचरण कडवकर, निवासी उपजिल्हाधिकारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.भारतीय रिझर्व बँकेचे अधिकारी,तसेच जिल्ह्यातील सर्व बँकेचे जिल्हा समन्वयक व एलआयसी अधिकारी या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.
या मोहिमेचा उद्देश १० वर्षांहून अधिक काळ व्यवहार न झालेल्या बँक खाती,मुदत ठेवी आणि इतर आर्थिक मालमत्तांबद्दल (उदा.शेअर्स, विमा) लोकांना माहिती देणे आणि कायदेशीर वारसांना/दावेदारांना ती रक्कम परत मिळवण्यासाठी सहाय्य करणे हा आहे.
भारत सरकार व भारतीय रिझर्व बँक यांच्या माध्यमातून देशभरात एक ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कलावधीत मागील १० वर्षांमध्ये ज्या खात्यांमध्ये व्यवहार झालेले नाहीत, आशा खात्यातील ठेवी भारतीय रिझर्व बँकेच्या नियमांनुसार ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधीमध्ये (डीईएएफ) हस्तांतरित केल्या जातात.बरेच लोक माहितीच्या अभावी अथवा मृत असल्याने या ठेवी परत मिळवण्यासाठी पाठपुरवठा करत नाहीत.पर्यायाने या ठेवी डीईएएफमध्ये हस्तांतरित होतात. अशा सर्व ठेवी योग्य ती कागदपत्रे बँकेत जमा करून ठेवींची रक्कम खातेदाराला अथवा वारसदाराला मिळू शकते.
बँक शाखांमध्ये ही विशेष मोहीम ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू राहील. दावा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नागरिकांनी आपली ओळखपत्रे (आधार/ पॅन), बँक खात्याचे तपशील,मुदत ठेव प्रमाणपत्रे (असल्यास),आणि वारस असल्यास मृत्यू प्रमाणपत्र व वारस प्रमाणपत्र यासारखी संबंधित कागदपत्रे शिबिरांमध्ये सोबत आणावीत.पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपली रक्कम परत मिळवावी,असे आवाहन श्री.कुमुद पंडा जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक,धाराशिव यांनी केले आहे.
