वंदे मातरम गीताच्या 150 वर्षानिमित्त
वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन
धाराशिव – वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिवच्या वतीने आज 7 नोव्हेंबर 2025 रोजी श्री तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल धाराशिव येथे वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले.या सामूहिक गीत गायनात शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धाराशिव आणि शहरातील विविध शाळा v महाविद्यालयातील 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कार्यक्रमास मुख्य मार्गदर्शक म्हणून अॅड.रवींद्र कदम यांची उपस्थिती होती.यावेळी मंचावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शिंदे,जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षणाधिकारी प्रवीण अवताडे, प्रसिद्ध उद्योजक संजय देशमाने, साहित्यिक युवराज नळे,धाराशीव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.नलावडे, उपशिक्षणाधिकारी श्री.होळकर, प्रशासकीय अधिकारी मल्हारी माने व गटशिक्षणाधिकारी अबरार शेख यांची उपस्थिती होती.
या सामहिक गीत गायन कार्यक्रमामध्ये श्रीपतराव भोसले हायस्कूल,शरद पवार हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल,भारत विद्यालय,सत्यभाभा विद्यालय,जिल्हा परिषद कन्या प्रशाला,तेरणा इंजिनिअरींग कॉलेज,आर.पी कॉलेज,शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,ग्रीनलॅन्ड हायस्कूल,विद्यामाता हायस्कूल, भगीरथीबाई लाटे विद्यालय यासह अन्य शाळा व महाविद्यालये सहभागी झाले.
श्रीपतराव भोसले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लघु नाटिका सादर केली.अनुजा जाधव या विद्यार्थिनीने वंदे मातरम गीताचे महत्त्व पटवून दिले.शाळा व महाविद्यालये या सामूहिक गीत गायनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. विद्यार्थ्यांनी वंदे मातरम आणि भारत माता की जय या दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
प्रारंभी मान्यवराच्या हस्ते भारत माता आणि वंदे मातरम गीत लिहिणारे बंकीमचंद्र चटटोपाध्याय यांच्या प्रतिमाचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.प्रवीण अवताडे यांनी केले.संचालन व उपस्थितांचे आभार शिवाजी चव्हाण यांनी मानले.
कार्यक्रमाला विविध शाळा व महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य,शिक्षकवर्ग तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व शिक्षकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.यशस्वीतेसाठी भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मारुती बिरादार व शिक्षक वृदांनी परिश्रम घेतले.