तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कल्लोळ तीर्थाचे पूजन
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आज श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक उत्साह, श्रद्धा आणि दिव्यांच्या प्रकाशात उजळलेले मंदिर परिसराचे सौंदर्य पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सपत्नीक कल्लोळ तीर्थाचे पूजन करण्यात आले. कल्लोळ तीर्थ पूजनानंतर मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी सौमय्याश्री पुजार, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, सहायक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, लेखापाल सिद्धेश्वर इंतुले, भंडारपाल नागेश शितोळे, जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध देशपांडे, अभिजित तेरखेडकर, उपाध्ये बंडो पाठक तसेच मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या भव्य दीपोत्सवाचे चोख व्यवस्थापन भंडारपाल नागेश शितोळे यांनी केले.
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मंदिर परिसरात हजारो दिव्यांची आरास, आकर्षक रांगोळ्या आणि सजावटीने परिसर उजळून निघाला होता. भाविकांनी दीपदान करून भक्तिभावाने देवीचे दर्शन घेतले.
त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते. भगवान शंकराच्या या विजयाच्या आनंदार्थ देवतांनी सर्वत्र दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता. त्यामुळे या दिवशी ‘देवदिवाळी’ साजरी करण्याची परंपरा आजही टिकून आहे.
धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अत्यंत पवित्र असून भगवान शंकर व भगवान विष्णू यांच्या पूजेस विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे भाविकांनी मंदिरात दर्शन, पूजन, आणि दीपदानाचा लाभ घेतला.
दीपोत्सवांच्या लखलखाटात उजळलेले मंदिर परिसराचे दृश्य भाविकांच्या मनात अविस्मरणीय ठरले. त्रिपुरारी पौर्णिमेचा हा दिव्य सोहळा भक्ती, आनंद आणि सांस्कृतिक परंपरेचा अद्भुत संगम ठरला.