धाराशिव – प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यात आज २७ सप्टेंबर २०२५ रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज शनिवारी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान खात्याने सूचित केल्याप्रमाणे,जोरदार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता असून,जिल्ह्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.ही सुट्टी अंगणवाडी,पूर्व प्राथमिक,प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक तसेच सर्व महाविद्यालये (सरकारी,खाजगी व आश्रमशाळा) यांना लागू राहणार आहे.
जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी पालक,शाळा व्यवस्थापन तसेच महाविद्यालयांना आवाहन केले आहे की,विद्यार्थ्यांची सुरक्षितता प्राधान्याने पाहावी आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक हालचाल टाळावी.