दि. 28/04/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे आई तुळजाभवानी मातेच्या मंदीर प्रस्तावित विकास आराखड्याच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. या बैठकीस माझ्यासह आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तसेच मंदिर परिसरातील पुजारी, व्यापारी व नागरिक उपस्थित होते. आई भवानीच्या भक्तीने प्रेरित होऊन, तुळजापूरच्या परंपरांचा आदर राखत आणि भविष्यासाठी मजबूत पायाभरणी करत खालील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले: मंदिराची पवित्र वास्तू व मूळ स्वरूप अखंड राखले जाईल. कोणताही अनावश्यक बदल न करता विकास आराखडा राबवला जाईल. पारंपरिक पूजा-पद्धती व कालाचार कायम राहतील. श्रद्धेचा गाभा अबाधित राहील. सेवेकऱ्यांची सेवा सुरक्षित ट्रस्टमार्फत मानधन तत्वावर सेवेची सलगता राखली जाईल. व्यापाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण! १९८८ मध्ये भूसंपादित रस्त्यावरील व्यापाऱ्यांना मावेजा तत्काळ दिला जाईल. व्यवस्थीत पुनर्वसन व सुविधा: विस्थापित व्यापाऱ्यांचे समर्पक पुनर्वसन सुनिश्चित करण्यात येईल. पुजारी व व्यापारी बांधवांचे हित सर्वोच्च: मूळ बाजारपेठ, व्यापारी व पुजारी यांचे विस्थापन टाळले जाईल. आई भवानीच्या मूळ मूर्तीचे महत्त्व जपले जाईल. १०८ फूट उंच भवानीमातेची भव्य मूर्ती: रामदरा तलाव परिसरात मूळ रचनेचा आदर राखून उभारण्यात येईल. भाविकांसाठी सुलभ दर्शनव्यवस्था: भक्तांचा सन्मान राखत सहज आणि समाधानकारक दर्शनासाठी प्रयत्न केले जातील. तुळजापूरची स्वच्छता व सौंदर्य वाढवण्यासाठी विशेष मोहिमा राबवण्यात येतील. आई भवानीच्या भक्तीचा गजर अखंड राहावा, परंपरा अभंग राहाव्यात आणि सर्व स्तरातील नागरिकांचे हित जपले जावे या ध्येयाने आम्ही कटिबद्ध आहोत! तुळजापूरचा विकास म्हणजे आपल्या श्रद्धेचा विजय आहे.