
धाराशिव ( प्रतिनिधी ) – रुपामाता नॅचरल शुगर यु. क्र. ०१, पाडोळी (आ.), ता. जि. धाराशिव येथे गाळप हंगाम २०२६–२७ निमित्त आयोजित मिल रोलर पूजन समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
समारंभाची विधिवत पूजा रुपामाता परिवाराचे मार्गदर्शक तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर गुंड (गुरुजी) आणि ह.भ.प. बाबुरावजी पुजारी यांच्या शुभहस्ते पार पडली. विधिवत पूजा करून गाळप हंगाम २०२६–२७ च्या कामांचा शुभारंभ करण्यात आला.
रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक तथा भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अॅड.व्यंकट गुंड पाटील आणि कार्यकारी संचालक अॅड.अजित गुंड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग समूह सातत्याने प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.
यावेळी बोलताना सुधाकर गुंड (गुरुजी) यांनी सांगितले की, कारखान्याची प्रतिदिन ८०० टनांनी ऊस गाळप क्षमता वाढवून आता २८०० टन प्रतिदिन करण्यात आली आहे. या विस्तारामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस वेळेत, जलद गतीने आणि पूर्ण क्षमतेने गाळप होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गाळप क्षमता वाढल्याने ऊस वाहतुकीतील विलंब कमी होऊन शेतकऱ्यांच्या हिताचे नियोजन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेला हा औद्योगिक विस्तार परिसराच्या कृषी व औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी जनरल मॅनेजर एम. जी. राठोड, चीफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, डेप्युटी चीफ इंजिनिअर संजय गुंड पाटील, चीफ केमिस्ट दिगंबर आवताडे, सुरक्षा अधिकारी लोकरे, रुपामाता परिवारातील हर्षल मोहिते व अनिकेत नवले यांच्यासह विभाग प्रमुख, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, कामगार, ऊस उत्पादक शेतकरी,वाहतूक ठेकेदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले