
विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आणि पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण

धाराशिव – महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून समाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान राखला गेला पाहिजे.पत्रकारांचे कार्य अत्यंत आव्हानात्मक असून ते निष्ठेने आणि व्रतस्थ भावनेने पार पाडले जाते.त्यामुळे पत्रकारांच्या समस्या जाणून घेऊन त्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, नगर परिषद,धाराशिव येथे दैनिक ‘पुण्य नगरी’च्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त कूपन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण,‘पुण्य पुरस्कार’ तसेच जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवानिमित्त कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक होते.
यावेळी माजी खासदार रवींद्र गायकवाड,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर,नगराध्यक्ष नेहा काकडे,पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे,सरचिटणीस संतोष जाधव,सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य,कोषाध्यक्ष संतोष हंबीरे, उपाध्यक्ष श्रीकांत कदम व अब्बास सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतलेले ५६७ निर्णय हे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी होते.‘लाडकी बहीण’ योजनेला सुरुवातीला विरोध झाला,मात्र ही योजना सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेत राज्य सरकारने अतिरिक्त सहा हजार रुपयांची भर घातली असून, एनडीआरएफपेक्षा दुप्पट नुकसानभरपाई देण्याचा निर्णयही घेतला.आपत्तीग्रस्तांना दिवाळीपूर्वीच ३२ हजार कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमातून नागरिकांना थेट सेवा देण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

“माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आहे,असे सांगत शिंदे यांनी मराठवाड्यातील दुष्काळ कायमचा दूर करण्याचा संकल्प व्यक्त केला.मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाद्वारे हा प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी १८६८ कोटी रुपयांच्या आराखड्याची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.