धाराशिव – इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत प्रवेश अर्ज सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आले आहेत.
बी.ए.,बी.कॉम.,बी.एस्सी.तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
सन २०२५-२०२६ साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे.प्रवेशासाठी अर्ज करण्याचा कालावधी दि.६ ते १५ फेब्रुवारी २०२६ असा असून,अर्ज छाननीचा कालावधी दि.१६ ते १८ फेब्रुवारी २०२६ राहील. पहिली निवड यादी गुणवत्तेनुसार अंतिम करून २० फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना २६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.वरीलप्रमाणे जिल्ह्यात सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून १०० विद्यार्थी क्षमतेचे मुला व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृह,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावयाचे आहेत.
ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org� या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील १२ वी नंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी वरील वेळापत्रकानुसार अर्ज करावेत,असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,धाराशिव यांनी केले आहे.