उमेदवारी अर्ज घेण्यासाठी भाऊगर्दी !
धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रियेला सुरुवात होताच धाराशिव तहसील कार्यालयात प्रचंड गर्दी उसळली आहे. सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थक तहसील परिसरात मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
सत्ताधारी व विरोधी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज घेण्यास सुरुवात केली असून,अनेक गटांतून इच्छुकांची संख्या जास्त असल्याने पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे.
तहसील कार्यालय परिसरात गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अर्ज घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत ही भाऊगर्दी कायम राहण्याची शक्यता असून, येत्या काही दिवसांत धाराशिव जिल्ह्याच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे.