जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महापालिका निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता मात्र, २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबतची प्राथमिक चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. उपलब्ध मनुष्यबळ, निवडणूक यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
५० टक्के आरक्षण न ओलांडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक पहिल्या टप्प्यात होईल असे संकेत आहेत. १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींसाठी जाहीर झालेले आरक्षण हे ५० टक्क्यांच्या मर्यादेत आहेत. तर, फक्त दोन महापालिकांमध्ये ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी निवडणूक आयोग दुसऱ्या टप्प्यात निवडणूक घेणार असल्याचे स्पष्ट आहे.