अक्कलकोट (प्रतिनिधी) – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या समर्थ महाप्रसाद सेवा उपक्रमाला दत्त जयंती 2025 रोजी चार वर्षे पूर्ण झाली. संस्थापक अध्यक्ष श्री जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या सेवेमुळे अक्कलकोटमधील २६५ गोरगरीब, वयोवृद्ध, निराधार आणि दिव्यांग नागरिकांना दररोज दोन वेळचे जेवण घरपोच दिले जाते.
या विशेष दिनानिमित्त अन्नछत्रात लाभार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. स्वामी समर्थांची भूमिका साकारणारे अक्षय मुदवाडकर, तसेच मंडळाचे सचिव मोरे काका, उपाध्यक्ष अभय खोबरे काका, आणि विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते ही वाटप प्रक्रिया पार पडली.
दररोज दोन वेळचे जेवण कोणताही खंड न पडता पोहोचवणाऱ्या समर्थ महाप्रसाद सेवा टीममधील आतिश पवार, ड्रायव्हर मारुती बोरकर आणि सेवक आप्पाशा मलवे यांचा विशेष सत्कार करून सन्मान करण्यात आला.
गेल्या चार वर्षांपासून सतत सुरू असलेली ही सेवा अक्कलकोट शहरातील अनेक कुटुंबांसाठी आधार ठरत असून, दत्त जयंतीनिमित्त सेवाभावी कार्याचा गौरव करण्यात आला.
