
धाराशिव – जनगणना -२०२७ अंतर्गत घर सूचीकरण (House Listing) प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार असून, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.
जनगणना प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांकडून नागरिकांच्या घर सूचीकरणाची आवश्यक ती नोंद पूर्ण केली जाणार आहे.तसेच काही कारणास्तव नागरिकांना दिनांक १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत स्वतः स्व-गणना (Self Enumeration) करणे शक्य झाले नसल्यास,अशा नागरिकांसाठी दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत नियुक्त प्रगणक घरभेटी देऊन माहिती संकलित करणार आहेत.
यावेळी नागरिकांनी शासनाने निर्धारित केलेल्या जनगणनेशी संबंधित ३३ प्रश्नांची माहिती प्रगणकांना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.या माहितीद्वारे संबंधित नागरिकांची नोंद जनगणनेच्या पोर्टलवर करण्यात येणार आहे.
घर सूचीकरण प्रक्रियेत इमारत व घर क्रमांक,घराचे स्थान,कुटुंबातील सदस्यांची संख्या,कुटुंब प्रमुखाचे नाव,लिंग व प्रवर्ग,राहण्याच्या खोल्यांची संख्या,विवाहित जोडप्यांची संख्या,उपलब्ध सुविधा-सुविधा,मालमत्ता,साहित्य आदी विविध बाबींची माहिती विचारली जाणार आहे.या सर्व माहितीच्या आधारे घर सूचीकरणाचे काम डिजिटल स्वरूपात पूर्ण करण्यात येईल.जनगणना -२०२७ संदर्भातील नागरिकांची माहिती पूर्णपणे गोपनीय व सुरक्षित ठेवली जाणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी जनगणना -२०२७ च्या टप्पा क्रमांक १ मध्ये सक्रिय सहभाग नोंदवून दिनांक १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत होणाऱ्या घर सूचीकरण प्रक्रियेसाठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना आवश्यक माहिती द्यावी आणि राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.
धाराशिव जिल्हा घर सूचीकरणाच्या कामकाजात राज्यात अग्रस्थानी राहावा,यासाठी सर्वांनी विशेष प्रयत्न करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.