
विश्व प्रशांत न्यूज प्रतिनिधी….
धाराशिव तालुक्यातील तेर येथे संत गोरोबाकाका मंदिराजवळ तेरणा नदीच्या पात्रात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ३० तासांच्या अथक, समन्वयित आणि शर्थीच्या प्रयत्नांनंतर अखेर सापडला. या संपूर्ण घटनेत प्रशासनाने केलेली धडपड आणि विशेषतः तहसील कार्यालय, धाराशिव यांच्या नेतृत्वाखाली राबवलेली कार्यवाही ही उल्लेखनीय ठरली असली, तरी एका तरुणाचा जीव वाचवता न आल्याची वेदना संपूर्ण गावाच्या मनात घर करून राहिली आहे.
दि. २४ रोजी अमर लक्ष्मण देवकुळे हा तरुण तेरणा नदीत पोहण्यासाठी उतरला; मात्र पाण्याचा अचूक अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात जाऊन बुडाला. घटनेनंतर गावकऱ्यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ नदीत उतरून शोधकार्य सुरू केले, पण नदीचा प्रवाह आणि खोली यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
घटनेची माहिती मिळताच प्रशासन तत्काळ सक्रिय झाले. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान धाराशिव येथून घटनास्थळी दाखल झाले. बोटीच्या सहाय्याने शोधमोहीम सुरू करण्यात आली; मात्र अंधार पडल्यामुळे सायंकाळी ६ वाजता शोधकार्य थांबवावे लागले. त्या रात्री अमरच्या कुटुंबीयांसाठी प्रत्येक क्षण असह्य वेदनेचा ठरला.
दि. २५ रोजी सकाळी शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी धाराशिवच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण परिस्थितीचा सखोल आढावा घेतला. त्यांनी केवळ पाहणी न करता तातडीने निर्णय घेत जलाशयातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी संबंधित विभागास पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यांच्या या निर्णयामुळे शोधमोहीमेला गती मिळाली.
तसेच, परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन तहसीलदार डॉ. जाधव यांनी अतिरिक्त तांत्रिक मदतीसाठी इंदापूर (जि. पुणे) येथील विशेष प्रशिक्षित बचाव पथकाला तातडीने पाचारण केले. या पथकात निखिल शिवतारे आणि बनारसी चव्हाण (बारामती) यांचा समावेश होता. त्यांच्या अनुभवी आणि तांत्रिक दृष्टिकोनातून केलेल्या शोधकार्यामुळे अवघ्या काही तासांत अमरचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले.
या संपूर्ण शोधमोहीमेत तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांनी प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, पोलीस विभाग आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात प्रभावी समन्वय साधत सतत मार्गदर्शन केले. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे आणि तात्काळ कृतीमुळे ही मोहीम शेवटपर्यंत सक्षमपणे राबवली गेली, असे उपस्थितांनी सांगितले.
दरम्यान घटनास्थळी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, तसेच ढोकीचे स.पो.नि. विलास हजारे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
अमरचा मृतदेह हाती लागताच कुटुंबीयांचा आक्रोश पाहून वातावरण सुन्न झाले. ३० तासांची आशा, प्रार्थना आणि प्रतीक्षा अखेर दुःखद शेवटाला पोहोचली… कालपर्यंत हसणारा, स्वप्न पाहणारा अमर आज कायमचा निघून गेला, ही जाणीव प्रत्येकाला अस्वस्थ करून गेली.
एक स्वप्न थांबलं… ३० तासांनी सापडलं फक्त शांत शरीर
तेर गाव आजही शांत आहे… पण त्या शांततेत एक खोल वेदना दडलेली आहे. हे दिसुन येते.