Spread the love

महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांना तातडीने संरक्षण, न्याय आणि मानसिक आधार मिळावा यासाठी ‘सखी’ वन स्टॉप सेंटर ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरत आहे.

भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे हिंसाचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली सर्व आवश्यक सेवा उपलब्ध होत असून,त्यांच्या आयुष्याला नव्याने उभारी देण्याचे काम हे केंद्र करत आहे. जिल्ह्यात १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत तब्बल २५८ प्रकरणांची नोंद झाली असून,अनेक महिलांना विविध स्वरूपाची मदत देऊन त्यांना सुरक्षिततेचा आणि न्यायाचा मार्ग दाखवण्यात आला आहे.

सन २०१९ पासून धाराशिव शहरातील मुख्य प्रशासकीय इमारतीतील रूम क्रमांक ८१ येथे हे केंद्र २४ तास कार्यरत आहे.वय, जात,वर्ग,शैक्षणिक किंवा वैवाहिक स्थितीचा विचार न करता शारीरिक, लैंगिक,भावनिक,मानसिक व आर्थिक अत्याचारांना सामोरे जाणाऱ्या महिलांना येथे आधार दिला जातो.लैंगिक छळ, कौटुंबिक हिंसाचार,मानवी तस्करी,ॲसिड हल्ले किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये पीडित महिलांना तातडीने मदत पुरविण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे.

या सेंटरद्वारे महिलांना पोलीस मदत, तात्पुरता निवारा,वैद्यकीय उपचार, कायदेशीर सल्ला आणि समुपदेशन अशा सर्व सेवा मोफत दिल्या जातात.पीडित महिलांना आवश्यकतेनुसार सुमारे १० दिवसांपर्यंत तात्पुरता निवारा देखील दिला जातो.विशेष म्हणजे,या सर्व सेवा एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे महिलांना विविध ठिकाणी धावपळ करण्याची गरज भासत नाही.

गेल्या वर्षभरात प्राप्त झालेल्या २५८ प्रकरणांपैकी २४ महिलांना वैद्यकीय मदत,२८ महिलांना कायदेशीर सहाय्य,१८६ महिलांचे समुपदेशन, ८ महिलांना पोलीस मदत आणि १२ महिलांना तात्पुरता निवारा देण्यात आला आहे.या आकडेवारीतून केंद्राची परिणामकारकता स्पष्टपणे दिसून येते.

महाराष्ट्रभर पसरलेल्या या केंद्रांचे जाळे महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. ‘सखी’ वन स्टॉप सेंटर हे केवळ मदतीचे केंद्र नसून,संकटात सापडलेल्या महिलांसाठी आशेचा किरण ठरत आहे.

संकलन
जिल्हा माहिती कार्यालय
धाराशिव