पवनचक्की व्यवहारांबाबत पालकमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश

Spread the love

शेतकऱ्यांच्या हितासाठी कागदपत्रांची
पूर्ण नोंदणी अनिवार्य

धाराशिव – (प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांच्या संदर्भात शेतकरी आणि कंपन्यांमध्ये अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला ठोस निर्देश देत शेतकऱ्यांच्या हितासाठी कडक भूमिका घेतली.”शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत कोणताही पुढील व्यवहार करण्यात येऊ नये,” असे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आजच्या या बैठकीला खासदार ओमप्रकाश माजी आमदार जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक शफकत आमना,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव व उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, पवनचक्की कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच संबंधित शेतकरी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की, गेल्या काही काळात पवनचक्की प्रकल्पासाठी जमिनीचे व्यवहार करताना शेतकऱ्यांना योग्य माहिती न देणे, करारपत्रांमध्ये त्रुटी ठेवणे किंवा अटी अस्पष्ट ठेवणे अशा अनेक तक्रारी पुढे आल्या होत्या.यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास डळमळीत झाला असून,त्यांना आर्थिक नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की,”शेतकरी हा या व्यवहारातील मुख्य घटक आहे.त्याला फसवले जाऊ नये याची हमी प्रशासनाने घ्यावी.पवनचक्की कंपनी आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय राखणे हे प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे.”

जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नियंत्रणाखाली यासाठी विशेष समिती नेमण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.ही समिती शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी,नोंदणी प्रक्रिया तसेच पवनचक्की कंपन्याकडून होणाऱ्या पुढील व्यवहारांचे नियमन करेल.कोणताही करार पारदर्शक पद्धतीने झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांचे सर्व हक्क सुरक्षित राहिले पाहिजेत,अशी अट घालण्यात आली आहे.

पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी पुढे सांगितले की,जिल्ह्यातील विकासकामांसाठी गुंतवणूक होणे महत्त्वाचे आहे,मात्र त्यासाठी शेतकऱ्यांचे हक्क गमावले जाऊ नयेत.पवनचक्की प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती आणि वीज उत्पादनाला चालना मिळणार असली,तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांनाही मिळाला पाहिजे.

बैठकीत अनेक शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली.काहींनी सांगितले की,त्यांना योग्य मोबदला मिळाला नाही,तर काहींनी करारातील अटींचे स्पष्टीकरण न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.या सर्व तक्रारी गांभीर्याने घेत पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

शेतकऱ्यांमध्ये यामुळे दिलासा निर्माण झाला आहे.पवनचक्की कंपनीसाठीही स्पष्ट नियम आखल्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि पुढील काळात वाद कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या समितीमुळे दोन्ही बाजूंचा विश्वास वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

पवनचक्की प्रकल्पांना हिरवा कंदील मिळाला असला तरी शेतकऱ्यांच्या हितसुरक्षेसाठी सरकारने कडक भूमिका घेतली आहे.कागदपत्रांची नोंदणी पूर्ण होईपर्यंत कोणताही व्यवहार होणार नाही, हा पालकमंत्री सरनाईक यांचा संदेश शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

  • Related Posts

    राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    Spread the love

    Spread the loveमुंबई. -: राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५०…

    परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६’ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत परळी वैजनाथ (जिल्हा बीड) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *