
धाराशिव :- सध्या सुरू असलेली बिदर–लातूर–धाराशिव–मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ही रेल्वे सेवा या परिसरातील हजारो प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थी, शासकीय व खासगी कर्मचारी, व्यावसायिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात या रेल्वे सेवेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे ही रेल्वे सेवा नियमित व कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात यावी.तसेच दरवर्षी दि. ६ डिसेंबर रोजी भारतरत्न, परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबई येथील चैत्यभूमी येथे अभिवादनासाठी जात असतात. धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यातूनही मोठ्या संख्येने अनुयायी या कार्यक्रमासाठी प्रवास करतात. या काळात नियमित रेल्वेमध्ये मोठी गर्दी होत असल्यामुळे अनेक प्रवाशांना प्रवास करणे कठीण जाते.त्यामुळे दि. २ डिसेंबर ते दि. १० डिसेंबर या कालावधीत धाराशिव–मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस)–धाराशिव विशेष जादा रेल्वे सुरू करण्यात यावी. तसेच आवश्यकतेनुसार अतिरिक्त डबे जोडून प्रवाशांची गैरसोय टाळण्यात यावी.
आपण सदर मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर आवश्यक कार्यवाही करुन अनुयायी यांची होणा-या गैरसोयी दुर कराव्यात असे लेखी निवेदन फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने रेल्वे विभागीय रेल्वे अधिकारी यांना जिल्हाधिकारी मार्फत दिले.निवेदनावर गणेश वाघमारे,अंकुश उबाळे,धनंजय वाघमारे, संजय गजधने, प्रविण जगताप संपतराव शिंदे यांच्या सह्या नावे आहेत.
