
धाराशिव : शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून,कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरून नागरिकांनी वाहतूक करणे टाळावे आणि पर्यायी रस्त्यांचा वापर करावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी केले आहे.शहरातील रस्त्यांची कामे सुरू असताना काही ठिकाणी सिमेंट, खडी व इतर बांधकाम साहित्य अंथरलेले आहे. या कच्च्या किंवा अर्धवट तयार रस्त्यावरून नागरिक वाहने घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत दोनचाकी व चारचाकी वाहन अशा सुरू असलेल्या कामांमध्ये अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहन चालकांनी काम सुरू असलेल्या रस्त्यांचा वापर न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करावा,असे वाघमारे यांनी सांगितले.दरम्यान,आर.पी. कॉलेज परिसरात नव्याने झालेल्या रस्त्याच्या मधोमध ड्रेनेज असून त्याठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत,शाळा व महाविद्यालयाच्या वेळेत या परिसरात मोठी गर्दी होत असल्याने अनेक वाहने या खड्ड्यात आपटत आहेत. काही ठिकाणी वाहनांची चाके रुतल्याने वाहने घसरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.धाराशिव शहरात अनेक वर्षांपासून रस्ते व नाल्यांची कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. काम पूर्ण होण्यापूर्वी वाहनांची ये-जा झाल्यास रस्त्याची गुणवत्ता बाधित होण्याबरोबरच वाहनांच्या चाकांचे ठसे कायम राहू शकतात. पुढील काळात याच ठिकाणी खड्डे किंवा असमतोल निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी काम सुरू असलेल्या रस्त्यांवरून वाहतूक न करता संबंधित विभाग व कंत्राटदारांना दर्जेदार काम करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी प्रसारमाध्यम मिडियातुन केले आहे.