
धाराशिव | प्रतिनिधी
परंडा तालुक्यातील निजाम जवळा येथील शेतकरी बाबुशा सुपनास पवार यांच्या शेतातील शेड पाडण्यात आल्याची घटनेची वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार प्रभाकर लोंढे आणि कॅमेरामन अण्णाभाऊ लोंढे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी व्हॉईस ऑफ मीडिया, धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, पत्रकार प्रभाकर लोंढे व अण्णाभाऊ लोंढे हे केवळ बातमी संकलन व वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्यासाठी घटनास्थळी गेले होते. मात्र, “शासकीय कामात अडथळा निर्माण केला” या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जनहिताच्या विषयांवर माहिती संकलित करून ती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. त्यामुळे केवळ वृत्तांकनासाठी घटनास्थळी उपस्थित राहणे किंवा चित्रीकरण करणे, याचा अर्थ शासकीय कामात अडथळा निर्माण करणे असा होऊ शकत नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणातील कारवाई अन्यायकारक असून ती पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याची भावना पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पत्रकार प्रभाकर लोंढे व अण्णाभाऊ लोंढे यांच्याविरोधातील गुन्हा तात्काळ मागे घ्यावा, तसेच पत्रकारांना कर्तव्य बजावताना अनावश्यक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनावर अनेक पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या असून पत्रकारांच्या एकजुटीचे दर्शन घडले.