धाराशिव – अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये,यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नूतनीकरण अर्जांची प्रक्रिया सुरू झाली आहे.पात्र विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी ऑनलाइन अर्ज करून त्याची हार्डकॉपी आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे जमा करावी,असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन कवले यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या,तसेच वसतिगृह प्रवेशासाठी रीतसर अर्ज करूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येते.
इयत्ता अकरावी,बारावी तसेच व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे,या उद्देशाने या योजनेअंतर्गत भोजन भत्ता,निवास भत्ता तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या २६ डिसेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुकास्तरावर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही लागू करण्यात आली आहे.
त्यानुषंगाने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणाचे अर्ज (Renewal Applications) स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. तसेच ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृह नाही,अशा तालुक्यातील विद्यार्थ्यांचे थेट स्वाधार योजनेचे अर्जही स्वीकारण्यात येत आहेत.
या योजनेसाठी https://hmasnew.mahait.org या पोर्टलवर १ ऑगस्ट २०२६ पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली असून,नूतनीकरण अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२६ आहे. त्यामुळे सन २०२६-२७ करिता नूतनीकरण अर्ज असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पूर्वी https://hmasnew.mahait.org या ऑनलाइन संकेतस्थळावर अर्ज करावा.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची हार्डकॉपी म्हणजे ऑनलाइन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे समाज कल्याण कार्यालय,धाराशिव येथे जमा करणे आवश्यक आहे.पात्र विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत अर्जाची प्रक्रिया पूर्ण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन सचिन कवले,सहायक आयुक्त,समाज कल्याण,धाराशिव यांनी केले आहे.