
धाराशिवमध्ये दोन दिवसीय मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात
शासकीय योजनांपासून आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीपर्यंत माहिती ; पोषण आहार,भरडधान्यांसाठी विशेष दालन
धाराशिव – केंद्र आणि राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक आहे. शासनाच्या विविध योजना,विकासाचे उपक्रम आणि त्यातून होत असलेले परिवर्तन सामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी समजून घेता यावे,यासाठी मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन हे महत्त्वाचे माध्यम आहे.त्यामुळे अशा माहितीपूर्ण प्रदर्शनांचे आयोजन नागरिक आणि शासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने धाराशिव येथील मध्यवर्ती बस स्थानकात आयोजित दोन दिवसीय मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रदर्शनाला आज मंगळवारी १ ऑगस्ट रोजी सुरुवात झाली.
उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर,पत्र सूचना अधिकारी हर्षल आकुडे,केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रसिद्धी प्रमुख सुमित दोडल,जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अजय पाटील,आगार प्रमुख प्रविण भोंडवे,जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम भालके आदी मान्यवर उपस्थित होते.
‘विश्वास, विकास आणि जनकल्याणा’ची वाटचाल प्रदर्शनातून
केंद्र सरकारच्या सेवेची १२ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने केंद्रीय संचार ब्यूरो,माहिती व प्रसारण मंत्रालय,भारत सरकारच्या क्षेत्रीय कार्यालय सोलापूर आणि जिल्हा प्रशासन,धाराशिव यांच्या सहकार्याने मध्यवर्ती बस स्थानकात या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘१२ वर्षे विश्वासाची,विकासाची, जनकल्याणाची – विकसित भारत
जी राम जी विधेयक-२०२५, राष्ट्रीय पोषण अभियान’ या संकल्पनेवर हे मल्टिमीडिया छायाचित्र प्रदर्शन आधारित आहे. प्रदर्शनामध्ये ग्रामीण रोजगाराशी संबंधित ‘विकसित भारत गॅरंटी रोजगार मिशन-२०२५ (व्ही.बी.जीराम जी कायदा-२०२५)’ या विषयाची माहिती नागरिकांना देण्यात येत आहे.
राष्ट्रीय पोषण माहनिमित्त विशेष दालन
सप्टेंबर महिना ‘राष्ट्रीय पोषण माह’ म्हणून साजरा करण्यात येतो.त्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनात पोषण आहाराबाबत स्वतंत्र दालन उभारले.