‘विक्रमापेक्षा मोठा विक्रम झाडे जगविण्याचा करुया – पालकमंत्री प्रताप सरनाईक

Spread the love

‘हरित धाराशिव २.०’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

धाराशिव – ‘हरित धाराशिव अभियान २.०’च्या माध्यमातून १२ तासांत १० लाखांहून अधिक वृक्षारोपण करून धाराशिवने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नवा विक्रम नोंदविला आहे.मात्र,हा विक्रम केवळ आकड्यांपुरता मर्यादित न राहता लावलेली प्रत्येक रोपे जगविण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे.‘आपण विक्रम तर केलाच; पण त्यापेक्षा मोठा विक्रम ही झाडे जगविण्याचा करूया,’असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

धाराशिवजवळील शिंगोली येथे वन विभागाच्या जागेसह जिल्ह्यातील आठ ठिकाणी १४ ऑगस्ट रोजी ‘हरित धाराशिव २.०’अंतर्गत १० लाख ९ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.या विक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.यानिमित्त शिंगोली येथील वन विभागाच्या परिसरात आज आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री सरनाईक बोलत होते.जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,जिल्हा परिषद उपाध्यक्षा उषा गायकवाड,विशेष अतिथी सिनेअभिनेते तथा देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे, जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर, लेखक व साहित्यिक अरविंद जगताप आणि शिंगोलीच्या सरपंच योगिता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘एक पेड माँ के नाम’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशातून प्रेरणा घेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळ देत धाराशिव जिल्ह्याने पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी केली आहे.हरित धाराशिव अभियान १.०’अंतर्गत १९ जुलै २०२५ रोजी एकाच दिवशी १७ लाख १ हजार ८१५ वृक्षांचे रोपण करून जागतिक विक्रमाची नोंद करण्यात आली.या अभियानातील ८६.९७ टक्के रोपे जिवंत राहिली, ही धाराशिवकरांच्या सामूहिक प्रयत्नांची खरी पावती असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले.

‘हरित धाराशिव अभियान २.०’अंतर्गत १२ तासांत १० लाख ११ हजार स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद करण्यात आली.जिल्ह्यातील आठ ठिकाणी ८३.२६ एकर क्षेत्रावर मियावाकी पद्धतीने घनवन विकसित केले जात आहे.प्रत्येक रोपाला स्वतंत्र QR कोड देऊन त्याची डिजिटल नोंद करण्यात आली आहे.तसेच छायाचित्रण, व्हिडिओ रेकॉर्डिंग,ड्रोन शूटिंग आणि हस्तलिखित लॉगबुकच्या माध्यमातून लागवडीची अचूक नोंद ठेवण्यात आली.हा विक्रम प्रशासनाचा नसून जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाचा आहे. वृक्षलागवड हा जीवनाचा संकल्प बनवून लावलेली सर्व झाडे जगविण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी,असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील ३०० कोटी वृक्षलागवडीत धाराशिव जिल्हा महत्त्वाचा वाटा उचलत आहे. जिल्ह्याला केवळ विक्रमाच्या नकाशावर नव्हे,तर हिरवाईच्या नकाशावर घेऊन जायचे आहे. भविष्यात लावलेली सर्व झाडे जगली पाहिजेत,यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.सर्वसामान्य नागरिकांना वृक्षलागवड व संवर्धनाबाबत जाणीव करून त्यांना प्रोत्साहित करावे. देवराईच्या माध्यमातून जिल्ह्यात वनराई वाढविण्यात येणार असून, त्यासाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या (CSR) निधीतून मदत उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले.

जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील म्हणाल्या,प्रत्येक गावात व्यक्तीच्या नावासह वृक्षलागवड करण्यात येणार आहे.पुढील तीन वर्षांत जिल्ह्यात १३ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांसाठी पालकमंत्र्यांनी सहकार्य करावे,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले, वृक्षारोपणाचे महत्त्व केवळ झाड लावण्यात नसून ते जगविण्यात आहे.झाडांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असून, कमी झाडे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये धाराशिवचा समावेश होतो.त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीची गरज आहे. धाराशिव फाउंडेशनच्या माध्यमातून वडगाव (सिद्धेश्वर) येथे १० हजार झाडांची लागवड करण्यात आली आहे.वृक्षलागवड ही लोकचळवळ झाली पाहिजे.फटाके आणि डॉल्बीमुळे होणारे प्रदूषण कमी करून वृक्षलागवडीकडे वळले पाहिजे.एका पिढीसाठी नव्हे,तर अनेक पिढ्यांसाठी वृक्षलागवड महत्त्वाचे काम आहे,असे त्यांनी सांगितले.

अभिनेते तथा देवराईचे अध्यक्ष सयाजी शिंदे म्हणाले,युवा वर्गाने पर्यावरणाबाबत जागरूक असले पाहिजे.‘वृक्ष प्रसाद योजना’ सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात श्रद्धेने रोपे लावली जातील.देवराई तयार करण्याची संधी मिळाल्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर काम करता येईल.जगातून जाताना माणूस काहीही सोबत घेऊन जात नाही; मात्र अन्न आणि श्वास झाडांपासूनच मिळतो.त्यामुळे प्रत्येक माणसाने आपल्या वयाएवढी झाडे लावली पाहिजेत.२०१३ पर्यंत आपल्याकडे देशी वृक्षलागवडीकडे पुरेसे लक्ष नव्हते. धाराशिवमध्ये सुरू असलेले वृक्षलागवडीचे काम कौतुकास्पद असून,देशी झाडे भक्तांच्या हस्ते लावली जावीत,असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार म्हणाले,१९ जुलै २०२५ रोजी जिल्ह्यात १५ लाख वृक्षांची लागवड करण्यात आली. पुढील २० वर्षांत राज्यात ३०० कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे.यात धाराशिवचा सिंहाचा वाटा असावा,या संकल्पनेतून मागील वर्षापासून ही मोहीम सुरू करण्यात आली. यासाठी ४० हून अधिक रोपवाटिकांतून रोपे तयार करण्यात आली.१२ तासांत १० लाख वृक्षांची लागवड करण्याची मोहीम जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून यशस्वी झाली.

धाराशिव हा दुष्काळी जिल्हा असून पर्जन्यमान कमी आहे. त्यामुळे मियावाकी पद्धतीने वृक्षलागवड करण्यात आली. प्रशासनासोबतच विविध सेवाभावी संस्था,विद्यार्थी,नागरिक आणि स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. विविध कंपन्यांनीही यासाठी मदत केली.१० लाख वृक्षलागवडीच्या मोहिमेसाठी २४ वनस्पतिशास्त्रज्ञ,स्वतंत्र निरीक्षक आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मागील वर्षी लावलेल्या १५ लाख झाडांपैकी १३ लाख झाडे जिवंत आहेत.जिल्ह्यात केवळ ०.१ टक्के वनक्षेत्र असून ते वाढविणे गरजेचे आहे.यासाठी जिल्ह्यात देवराई प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यामुळे वनाखालील क्षेत्र वाढण्यास मदत होईल,असे पुजार यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.

‘हरित धाराशिव २.०’साठी सहकार्य करणारे प्लॅनेटरा टीमचे श्री.चोले व त्यांचे सहकारी, सेरेंटिकाचे सुरजीत नारायण, प्रायमुव्हचे सिद्धार्थ विश्वकर्मा,स्टेट बँक ऑफ इंडियाचे पृथ्वीराज पाटील,जेएसडब्ल्यू फाउंडेशनचे बसवराज दालगळे,टोरेंट ग्रीन एनर्जीचे विजय दलहाडे आणि बँक ऑफ महाराष्ट्राचे मिथिलेश पांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

‘हरित धाराशिव २.०’अंतर्गत १२ तासांत १० लाख वृक्षलागवड पूर्ण करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी ऋषी नाथ यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.यावेळी पालकमंत्री सरनाईक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी यांनी केले,तर उपस्थितांचे आभार विभागीय वन अधिकारी येडलावर यांनी मानले.कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी,कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पालकमंत्री सरनाईक तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

  • Related Posts

    धाराशिवच्या शिरपेचात मानाचा तुरा! १२ तासांत सर्वाधिक मियावाकी वृक्षलागवडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

    Spread the love

    Spread the loveधाराशिवच्या शिरपेचात मानाचा तुरा! १२ तासांत सर्वाधिक मियावाकी वृक्षलागवडीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धाराशिव : पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात धाराशिव जिल्ह्याने देशाच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. जिल्हा…

    झोक्याचा आनंद घेत निसर्गरम्य वातावरणात पंचमी महोत्सव साजरा.. पर्यटन विकास समितीचा अनोखा उपक्रम,नागनाथ मंदिर परिसरात स्वच्छता,वृक्षारोपण व सांस्कृतिक कार्यक्रम.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव :- जिल्ह्यातील पर्यटनस्थळांच्या विकासासाठी पर्यटन जनजागृती संस्था धाराशिव संचलित पर्यटन विकास समितीच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीचा योग साधत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *