धाराशिव – महाराष्ट्र शासन उद्योग,ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रक २८/११/२०२५ नुसार नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतदानासाठी सर्व कामगार,अधिकारी व कर्मचार्यांना पगारी सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की,मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार,अधिकारी किंवा कर्मचारी मग ते कामानिमित्त इतरत्र कार्यरत असले तरी निवडणूक दिवशी पगारी सुट्टीस पात्र राहतील.ही सुविधा उद्योग विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह,महामंडळे,कंपन्या, संस्था,औद्योगिक उपक्रम तसेच इतर आस्थापनांसाठी लागू राहील.
अपवादात्मक परिस्थितीत संपूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधित कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी किमान दोन तासांची सवलत देणे बंधनकारक राहील.तथापि,यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार असून,कोणत्याही परिस्थितीत मतदारांना किमान दोन तासांची सवलत नाकारली जाणार नाही,याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घ्यावी,असे परिपत्रकात नमूद आहे.
नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व दुकाने,आस्थापना, निवासी हॉटेल,खाद्यगृहे,व्यापार, औद्योगिक उपक्रम व अन्य आस्थापनांच्या मालकांना त्यांच्या कामगारांना २ डिसेंबर २०२५ रोजी मतदानासाठी आवश्यक ती सवलत देणे बंधनकारक असल्याचे सरकारी कामगार अधिकारी श्री.सुधाकर कोनाळे यांनी कळविले आहे. जिल्ह्यातील सर्व कामगारांना पगारी सुट्टी दिली जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदानाशी संबंधित उद्भवणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी सरकारी कामगार अधिकारी कार्यालय,धाराशिव येथे तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.संबंधित कामगार व कामगार संघटनांनी तक्रारींसाठी दूरध्वनी क्रमांक ०२४७२-२२४३२७ वर संपर्क साधावा,असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी,धाराशिव यांनी केले आहे.