तुळजापूर येथे सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाचे लोकार्पण

धाराशिव – आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक तुळजापूरमध्ये येतात.या भाविकांची तसेच नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता असून,‘सुरक्षित तुळजापूर ही केवळ शासनाची जबाबदारी नसून सर्वांची सामूहिक बांधिलकी आहे. तुळजापूरच्या सुरक्षिततेला सीसीटीव्हीचे कवच मिळाले असून त्यामुळे भाविकांचा विश्वास अधिक दृढ होणार आहे.असे प्रतिपादन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
तुळजापूर शहर सीसीटीव्ही निगराणी प्रकल्पाच्या लोकार्पणप्रसंगी पोलिस स्टेशन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्रीमती.अर्चना पाटील,माजी आमदार ज्ञानराज चौगुले,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची मंचावर प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री.सरनाईक म्हणाले की,धाराशिव जिल्ह्याच्या सन २०२४-२५च्या वार्षिक नियोजनातून सुमारे १० कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.तुळजापूर शहरातील ६२ महत्त्वाच्या ठिकाणी २३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून,नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ३० ठिकाणी स्पीकर आणि धोकादायक अथवा महत्त्वाच्या परिस्थितीची सूचना देण्यासाठी १५ ठिकाणी अलार्म सिस्टिम उभारण्यात आली आहे.गुन्हा घडल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यापेक्षा गुन्हा घडूच नये,यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा मजबूत करणे महत्त्वाचे आहे. सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांचा तपास,वाहतूक नियंत्रण तसेच संशयास्पद हालचालींवर तातडीने लक्ष ठेवणे शक्य होणार असून,महिला व मुलींच्या सुरक्षिततेलाही त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
तुळजापूरला दररोज २५ ते ३० हजार,तर सुट्टीच्या दिवशी सुमारे ४० हजार भाविक भेट देतात असे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,नवरात्र महोत्सवात ही संख्या लाखोंच्या घरात जाते.त्यामुळे शहराच्या विकासासोबतच सुरक्षिततेच्या पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे.आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक सुरक्षितपणे तुळजापूरमध्ये यावा,शांततेत दर्शन घ्यावे आणि सुरक्षितपणे आपल्या घरी परत जावा,ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,असे पालकमंत्र्यांनी नमूद केले.या प्रकल्पामुळे तुळजापूर अधिक सुरक्षित,शिस्तबद्ध आणि आधुनिक शहर म्हणून विकसित होण्यास मदत होईल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.