१९७८ पासूनचा संघर्ष, संघटन आणि पक्षनिष्ठेचा इतिहास मांडत गुंड कुटुंबाची भूमिका; “निष्ठा शब्दांनी नव्हे, तर कृतीतून सिद्ध होते”
धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज

निष्ठेचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा, अशा शब्दांत गुंड कुटुंबाने आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना थेट प्रत्युत्तर दिले आहे. जिल्ह्यातील निष्ठावंत, संघर्ष करणाऱ्या आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना मा. जिल्हाध्यक्षांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने आपली पोस्ट करण्यात आली होती, असे स्पष्ट करत गुंड कुटुंबाने १९७६ पासून आजपर्यंतचा आपला संघटनात्मक, सामाजिक आणि राजकीय प्रवास सविस्तरपणे मांडला आहे.
१९७६ पासून संघविचाराशी नाते
१९७६ पासून संभाजी राव भिडे गुरुजी यांच्या संपर्कातून आम्ही संघाशी जोडले गेलो. १९७८ पासूनचा प्रवास हा संघर्षाचा, विचारधारेचा आणि निष्ठेचा असल्याचे गुंड कुटुंबाने म्हटले आहे.
आमच्या कुटुंबाचा सार्वजनिक आणि राजकीय प्रवास काल-परवाचा नाही. १९७८ पासून आजपर्यंतचा हा प्रवास आहे.
१९७८ मध्ये तत्कालीन महासत्तेच्या जनसंघ या राजकीय विचाराने प्रेरित होऊन ग्रामपंचायत निवडणूक लढवून सत्ता स्थापन करण्यात आली आणि श्री. सुधाकर गुंड गुरुजी यांनी उपसरपंचपदाची जबाबदारी सांभाळली.
भाजप स्थापनेपासून संघटनात्मक जबाबदारी
१९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे पहिले प्रदेशाध्यक्ष मा. उत्तमराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री. सुधाकर गुंड गुरुजी यांनी पहिले तालुकाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर १९९५ ते २००१ अशी दोन टर्म त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली होती.
१९७८ ते २०२२ या कालावधीत केवळ एक टर्म वगळता, आमच्या कुटुंबातील चार सदस्यांनी सरपंच व उपसरपंच म्हणून गावाच्या विकासाची जबाबदारी पार पाडली.
हा प्रवास कोणत्याही पदासाठी केलेल्या तडजोडीचा नाही. हा प्रवास गाव, समाज, संघटन आणि विचारधारेसाठी केलेल्या कामाचा आहे, अशी भूमिका गुंड कुटुंबाने मांडली आहे.
पाच वेळा जिल्हा परिषद निवडणूक
१९९२ ते २०१७ या कालावधीत आम्ही पाच वेळा जिल्हा परिषद निवडणूक लढवली. त्यापैकी एक वेळेस सौ. सुलभा व्यंकट गुंड व दोन वेळेस गुंड गुरुजी अशी तीन वेळा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली.
दोन वेळा परिस्थितीजन्य कारणांमुळे इतर पक्षांकडून निवडणूक लढवावी लागली. पक्षांतर्गत राजकारणामुळे आणि बाहेरून आलेल्या मंडळींच्या हस्तक्षेपामुळे उमेदवारी नाकारली गेली, तरी आम्ही आमची ताकद दाखविण्यासाठी परिस्थितीसमोर झुकलो नाही, निवडणूक लढवली व जिंकली.
अन्य पक्षाकडून मिळालेल्या संधीचा स्वीकार हा केवळ निवडणुकीपुरता होता. जनतेच्या आशीर्वादाने विजय मिळवला; परंतु विचारधारा आणि राजकीय भूमिका जुळत नसल्याने पुन्हा आपल्या मूळ विचारधारेत आणि पक्षात परतलो.
म्हणूनच केवळ निवडणुकीच्या आकड्यांवरून निष्ठेचे मोजमाप करणाऱ्यांनी संपूर्ण इतिहास समजून घेणे गरजेचे आहे, असे गुंड कुटुंबाचे म्हणणे आहे.
तत्कालीन सत्तेविरोधात संघर्ष
तेरणा कारखान्याच्या तत्कालीन महासत्तेच्या विरोधात दोन वेळा निवडणूक लढवली; मात्र सत्तेच्या जोरावर हरवले गेले, असा दावा गुंड कुटुंबाने केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत महासत्तेच्या विरोधात तब्बल तीन वेळा स्वतंत्र पॅनल उभे करून लढा दिला.
ज्यावेळी सत्तेच्या विरोधात उभे राहणे सोपे नव्हते, त्यावेळी आम्ही संघर्षाची भूमिका घेतली.
म्हणून आज सोशल मीडियावर दोन ओळी लिहून आम्हाला “संघर्ष”, “निष्ठा” आणि “पक्षहित” शिकवण्याची गरज नाही, असा थेट इशाराही या भूमिकेतून देण्यात आला आहे.
१९९२ ची कारसेवा; संघर्ष प्रत्यक्ष अनुभवलेला
१९९२ च्या कारसेवेत आमच्या कुटुंबातील आई-वडील आणि बंधूंनी सहभाग घेतला. त्या काळात लखनऊ येथील सेंटर जेलमध्ये कारावासही भोगावा लागला.
हा इतिहास फेसबुकच्या पोस्टमधून तयार झालेला नाही. तो प्रत्यक्ष अनुभवलेला आहे, असे गुंड कुटुंबाने स्पष्ट केले आहे.
बजरंग दलाच्या संघटनात्मक कामाचा दावा
१९९४-९५ मध्ये बजरंग दलाचे जिल्हास्तरीय संघटनात्मक काम करत असताना जिल्ह्यातील सुमारे १,०५० तरुणांना रेल्वेने प्रयागराज (तत्कालीन अलाहाबाद) येथील अधिवेशनाला घेऊन जाण्याचे काम करण्यात आले.
हे काम कोणत्याही पदाच्या अपेक्षेने नव्हते. तेव्हा सोशल मीडिया नव्हता, प्रसिद्धीची साधने नव्हती; पण कार्यकर्त्यांना जोडण्याची आणि संघटन उभे करण्याची जिद्द होती.
२०१९ आणि २०२४ मध्ये पक्षनिर्णयाचा सन्मान
२०१९ मध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून स्वतः दावेदार असतानाही पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या निर्णयाचा सन्मान केला.
२०२४ ला निवडणूकपूर्व गावोगाव संवाद यात्रा घेऊन तयारी करूनसुद्धा आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार उमेदवारी मागे घेतली.
जर स्वार्थ आणि पद हाच आमच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असता, तर त्या वेळी पक्षाचा निर्णय मान्य करून काम केले असते का?
पदापेक्षा पक्ष मोठा — हीच आमची भूमिका तेव्हाही होती आणि आजही आहे.
जिल्हाध्यक्षांच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न
जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे असलेला निर्णयाचा अधिकार ते पूर्णपणे स्वतंत्रपणे वापरत आहेत का?
संघटनात्मक नियुक्त्या, उमेदवारी आणि कार्यकर्त्यांना संधी देताना त्यांना स्वतःच्या विवेकाने, पक्षहित लक्षात घेऊन आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा विचार करून निर्णय घेण्याची पूर्ण मुभा आहे का?
हा प्रश्न विचारणे म्हणजे जिल्हाध्यक्षांचा अपमान नाही. उलट, त्यांच्या पदाचा अधिकार आणि निर्णयक्षमता अधिक मजबूत व्हावी, हीच आमची अपेक्षा आहे.
“आम्हाला वेळ असतो का?” याचे उत्तरही स्पष्ट
आम्हाला कुणाकडून वेळ मागायची गरज नाही.
आमचा वेळ आम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी, बेरोजगार युवकांसाठी, महिलांसाठी आणि स्थानिक रोजगारनिर्मितीसाठी देत आहोत.
परिवाराच्या माध्यमातून—
दुग्ध/ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देणे
जिल्ह्यात रोजगारनिर्मिती करणे
बेरोजगार युवकांना संधी उपलब्ध करून देणे
महिला सक्षमीकरणाला चालना देणे
शेतीशी संबंधित जोडधंदे उभे करणे
बँकिंग, शिक्षणाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देणे
हे काम आम्ही करत आहोत.
हे पक्षविरोधी काम नाही. समाजासाठी रोजगार निर्माण करणे, युवकांना संधी देणे, शेतकऱ्यांना आधार देणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हे देखील राष्ट्रहिताचे नाही का?
“आधी इतिहास समजून घ्या!”
शेवटी एकच सांगायचे आहे…
आमच्या कुटुंबाचा १९७८ पासूनचा इतिहास कोणत्याही फेसबुक पोस्टने पुसला जाणार नाही.
ज्यांनी पोस्ट केली आहे, कदाचित त्यांचा १९७८ ला जन्मही झाला नसेल. गुत्तेदारी, दलाली व हुजरेगिरी करून उदरनिर्वाह करणाऱ्यांनी आमच्यावर बोलण्याचे कर्तृत्व काय?
आपण आधी कोणकोणत्या पक्षात पदाधिकारी म्हणून काम करत होतात, हे सर्वांना माहीत आहे.
निष्ठेचे प्रमाणपत्र वाटण्यापूर्वी स्वतःचा राजकीय इतिहास तपासावा. कारण निष्ठा ही शब्दांनी नाही, तर अनेक वर्षांच्या संघर्षातून आणि कृतीतून सिद्ध होत असते.
जिल्हाध्यक्षांनी या सर्व बाबतीत कोणत्याही दबावाला बळी न पडता, स्वतःच्या विवेकबुद्धीने आणि पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन निर्णय घ्यावेत, हीच आमची भूमिका आहे.
आम्ही जिल्हाध्यक्षपदाचा सन्मान करतो. कारण दोन टर्म हे पद आमच्या घरात होते. त्यामुळे जिल्ह्यातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भावना मांडण्याचा अधिकारही आम्हाला आहे.
आधी इतिहास समजून घ्या! यापेक्षा अधिक आम्हाला बोलायला भाग पाडू नये.