१५ अधिकारी निलंबित; मात्र मुख्य सूत्रधारावर कारवाई कधी?
“कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही; लवकरच कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची भेट घेणार” — शेतकरी पुत्र मनोज जाधव

धाराशिव : धाराशिव जिल्हा कृषी विभागातील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तब्बल १५ अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्यानंतरही या प्रकरणातील एक महत्त्वाचा अधिकारी अद्याप कारवाईपासून दूर असल्याचा आरोप शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची खरी व्याप्ती समोर आणण्यासाठी आपला लढा सुरूच राहणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
कृषी विभागातील अनियमितता आणि गैरप्रकारांचा मुद्दा सातत्याने उपस्थित करत असताना ज्या प्रकरणातून या संपूर्ण विषयाला सुरुवात झाली, त्याच प्रकरणाशी संबंधित ‘बडा मासा’ अद्याप मोकाट का?, असा सवाल मनोज जाधव यांनी उपस्थित केला आहे.
“१५ अधिकारी निलंबित झाले, ही निश्चितच कारवाईची सुरुवात आहे; मात्र प्रकरणाची सुरुवात ज्या ठिकाणापासून झाली, त्या ठिकाणच्या संबंधित व्यक्तीवर अद्याप कारवाई झाली नसेल तर संपूर्ण प्रकरणाला न्याय मिळाला असे कसे म्हणता येईल?” असा सवाल जाधव यांनी केला.
कृषी विभागातील या प्रकरणात पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होऊन दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. “कोणत्याही दबावाला बळी न पडता शेवटच्या दोषी व्यक्तीपर्यंत कारवाई झाली पाहिजे. संबंधित ‘बड्या माशावर’ निलंबनाची कारवाई होईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, या प्रकरणासंदर्भात आणखी सबळ पुरावे राज्य सरकारसमोर मांडण्यासाठी आपण लवकरच राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचे मनोज जाधव यांनी सांगितले. या भेटीत संपूर्ण प्रकरणाची माहिती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित अधिकाऱ्याविरोधातील मुद्दे सादर करून कायदेशीर आणि पारदर्शक कारवाईची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“१५ जणांवर कारवाई झाली, पण ‘तो’ अजूनही बाहेरच का?”
कृषी विभागातील कारवाईनंतर आता सर्वांचे लक्ष त्या कथित ‘बड्या माशावर’ केंद्रित झाले आहे. या व्यक्तीवर कारवाई होणार का, चौकशीचा फास त्याच्यापर्यंत पोहोचणार का आणि कृषिमंत्री या प्रकरणात कोणती भूमिका घेणार? याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“शेतकऱ्यांच्या पैशांशी आणि त्यांच्या हक्कांशी संबंधित प्रश्न असेल, तर शेवटपर्यंत आवाज उठवणार. कारवाई होईपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा निर्धार शेतकरी पुत्र मनोज जाधव यांनी व्यक्त केला.